बीड (प्रतिनिधी): बॉलिवूडच्या एखाद्या चित्रपटात आपण अनेकदा पाहतो की, नायकाची स्मृती जाते आणि अचानक एखाद्या धक्क्याने किंवा अपघाताने त्याला पुन्हा जुने दिवस आठवतात. हे सगळं पडद्यावर पाहताना खूप भारी वाटतं. पण, असाच एखादा ‘डेंजर क्लायमॅक्स’ खऱ्या आयुष्यात, तेही आपल्या बीड जिल्ह्यात घडला आहे, यावर तुमचा विश्वास बसेल का? नियतीचा हा अद्भूत आणि अंगावर काटा आणणारा खेळ अनुभवला आहे बीडच्या प्रकाश जाधव यांनी. तब्बल ३२ वर्षांच्या वनवासानंतर प्रकाश आपल्या गावी परतले आणि त्यांची ही कहाणी ऐकून संपूर्ण गावकऱ्यांचे डोळे पाणावले.
नेमकी सुरुवात कुठून झाली? सायकलचा तो हट्ट…
गेवराई तालुक्यातील केकत पांगरी येथील हरिलाल नाईक तांड्यावरील हे मूळ कुटुंब. १९७२ च्या भीषण दुष्काळात प्रकाश यांचे वडील जनार्दन जाधव उदरनिर्वाहासाठी नाशिकला गेले होते. तिथे त्यांनी एक छोटेसे दुकान थाटून संसाराचा गाडा हाकण्यास सुरुवात केली. प्रकाश तेव्हा दहावीत होते. शाळेत जाण्यासाठी त्यांनी आई-वडिलांकडे सायकलचा हट्ट धरला. पण गरिबीमुळे आई-वडील सायकल घेऊन देऊ शकले नाहीत. याच गोष्टीचा राग आल्याने अवघ्या १६ व्या वर्षी प्रकाश यांनी थेट घर सोडले.
हॉटेलमध्ये काम, पण शिक्षणाची जिद्द कायम
रागाच्या भरात घर सोडल्यानंतर प्रकाश यांच्या खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. पोटापाण्यासाठी त्यांनी एका हॉटेलमध्ये काम करणे सुरू केले. मात्र, त्यांच्यातील शिक्षणाची आवड संपली नव्हती. हॉटेलमध्ये काम करत करत त्यांनी आपले शिक्षण जिद्दीने सुरू ठेवले. पण नियतीच्या मनात त्यांच्यासाठी एक वेगळीच आणि भयानक परीक्षा लिहिलेली होती.
…आणि नियतीचा घाला! एका हल्ल्यात सर्वस्व हरपले
आयुष्य सावरत असतानाच प्रकाश यांच्यावर अचानक एक जीवघेणा हल्ला झाला. या भयानक हल्ल्यात ते बचावले खरे, पण त्यांच्या मेंदूवर गंभीर आघात झाला आणि त्यांची संपूर्ण स्मृती (Memory) गेली. आपलं नाव काय, आपलं मूळ गाव कोणतं, आई-वडील कुठे आहेत, हे सगळंच ते विसरून गेले. यानंतरचा त्यांचा अनेक वर्षांचा प्रवास म्हणजे स्वतःची ओळख हरवून अंधारात चाचपडण्यासारखाच होता.
३२ वर्षांनंतर घडला चमत्कार! अपघाताने परत दिली ओळख
अनेक वर्षे स्वतःची ओळख नसताना जगल्यानंतर नुकताच प्रकाश यांच्यासोबत एक अपघात झाला. पण हा अपघात त्यांच्यासाठी एक ‘चमत्कार’च ठरला. या अपघाताच्या धक्क्याने त्यांची हरवलेली स्मृती अचानक परत आली! त्यांना आपलं नाव, आपलं गेवराईतील गाव, हरिलाल नाईक तांडा आणि आई-वडिलांचा तो चेहरा एका क्षणात पुन्हा आठवला.
अश्रूंचा बांध फुटला… ३२ वर्षांनी लेक गावी परतला!
स्मृती परत येताच, ४७ वर्षीय प्रकाश जाधव यांनी थेट आपले मूळ गाव बीडमधील केकत पांगरी गाठले. तब्बल ३२ वर्षांनंतर हरवलेला मुलगा अचानक समोर उभा पाहिल्यानंतर कुटुंबीयांच्या आणि गावकऱ्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. किशोरवयात घर सोडलेला तो मुलगा आता ४७ वर्षांचा प्रौढ झाला होता. ३२ वर्षांचा हा वनवास आणि नियतीचा हा खेळ ऐकून प्रत्येक जण निशब्द झाला होता.
बीड जिल्ह्यातील अशाच हृदयस्पर्शी आणि ताज्या बातम्यांसाठी वाचत राहा clicktonews.in




