बीड (प्रतिनिधी): पारदर्शक परीक्षेचा मोठा गाजावाजा करणाऱ्या प्रशासनाचा बोजवारा आज बीडमध्ये उडाला. अंबाजोगाई येथील परीक्षा केंद्रावर पोलीस पाटील पदाच्या परीक्षेदरम्यान झालेला सावळागोंधळ पाहून उमेदवारांनी कपाळाला हात लावून घेतला आहे. सुरुवातीलाच चुकीच्या संचाच्या प्रश्नपत्रिका वाटल्या गेल्याने परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ उडाला. “आमच्या भविष्याशी खेळू नका,” अशा संतप्त भावना व्यक्त करत परीक्षार्थ्यांनी आता ही परीक्षा रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे.
नेमकं काय घडलं? अंबाजोगाई केंद्रावरील तो ‘गोंधळ’
रविवारी सकाळी पोलीस पाटील पदासाठीची परीक्षा सुरू झाली. उमेदवार मोठ्या उमेदीने पेपर सोडवायला बसले होते, मात्र काही वेळातच त्यांच्या लक्षात आले की, मिळालेली प्रश्नपत्रिका आणि दिलेला संच यामध्ये मोठी तफावत आहे. अंबाजोगाईतील केंद्रावर चुकीच्या प्रश्नपत्रिका वाटल्या गेल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली. प्रशासनाने घाईघाईत या प्रश्नपत्रिका परत घेतल्या आणि दुसऱ्या दिल्या, पण तोपर्यंत परीक्षार्थ्यांचा अमूल्य वेळ निघून गेला होता.
मानसिक संतुलन ढासळलं; वेळेचं गणित कोलमडलं
एकीकडे स्पर्धा परीक्षेचा ताण आणि त्यात प्रशासनाचा हा निष्काळजीपणा, यामुळे अनेक उमेदवारांचे मानसिक संतुलन ढासळले. “काहींना प्रश्नपत्रिका बदलून देण्यात उशीर झाला, तर काहींना जादा वेळ मिळेल की नाही, याबाबत स्पष्टता नव्हती. एकाच वर्गात दोन वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागल्याने या परीक्षेच्या पारदर्शकतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे,” असे एका परीक्षार्थ्याने ‘Hello Beed’ शी बोलताना सांगितले.
“हा तांत्रिक घोळ नाही, तर नियोजनशून्यता!”
परीक्षार्थ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. “हा केवळ तांत्रिक बिघाड म्हणता येणार नाही, तर हा प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचा आणि निष्काळजीपणाचा जिवंत नमुना आहे,” असा आरोप उमेदवारांनी केला आहे. कष्ट करून परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांच्या भवितव्याशी हा खेळ असल्याची भावना सध्या बीडमध्ये उमटत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; परीक्षा रद्द करण्याची मागणी
या गंभीर प्रकारानंतर संतापलेल्या उमेदवारांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करून ही सदोष परीक्षा रद्द करण्यात यावी आणि नव्याने पारदर्शक पद्धतीने परीक्षा घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासन काय भूमिका घेणार?
आता या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक वळण घेतले असून, प्रशासन यावर काय खुलासा करते आणि दोषींवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जर न्याय मिळाला नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशाराही उमेदवारांनी दिला आहे.
बीडच्या प्रत्येक घडामोडीसाठी क्लिक करा




