मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आज दिल्ली दौऱ्यावर होते. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या मराठी विद्यार्थ्याने शौर्य प्रदीप पाटील याने शाळेतील कथित मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर जरांगे पाटील यांनी शौर्यच्या कुटुंबीयांची भेट घेतली. शौर्य पाटीलचे कुटुंब मूळचे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील असल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “या प्रकरणात केंद्र सरकारने तात्काळ आणि कठोर कारवाई करावी. संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी. शौर्य पाटीलचा बळी आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही,” असे ते म्हणाले. या प्रकरणात केंद्रीय गृह मंत्रालयाने आणि गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली.
जरांगे पाटील पुढे म्हणाले, “जेव्हा दिल्लीला गरज असते, तेव्हा महाराष्ट्र मदतीसाठी पुढे येतो. जर अशी घटना महाराष्ट्रात घडली असती तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाई केली असती. मात्र, दिल्लीत मराठ्यांच्या लेकराचा बळी जाऊनही सरकार आधार देण्यास तयार नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे.”
आंदोलनाचा इशारा देताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्हाला अमित शाहांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. संबंधित आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. मराठ्यांच्या मुलाचा बळी वाया जाऊ देणार नाही. वेळ आली तर मुंबईप्रमाणे दिल्लीही आम्ही तुंबवू,” असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
या वक्तव्यामुळे दिल्लीतील प्रशासनासह केंद्र सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणावर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








