मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील राजकीय वातावरण तापत असतानाच मनसे आणि ठाकरे गटाच्या संभाव्य युतीबाबत मोठी चर्चा सुरू आहे. यासंदर्भात शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. “ठाकरे बंधूंच्या युतीबाबत योग्य वेळी निर्णय जाहीर होईल,” असं सूचक विधान राऊत यांनी केलं आहे.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. मुंबई, ठाण्यासह सर्व महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान, तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला असून, युती आणि आघाड्यांबाबत बैठका सुरू झाल्या आहेत.
पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच राज्यातील अनेक महापालिकांमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांची युती होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, मनसे–ठाकरे गट युतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. यासह राज्यातील राजकीय व अन्य महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत लाईव्ह अपडेट्स पाहत राहा.








